Monday, September 5, 2022

महाराष्ट्र होईल शेतकरी आत्महत्यामुक्त; शिंदे सरकार स्वीकारणार पंचसूत्री कार्यक्रम- महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र होईल शेतकरी आत्महत्यामुक्त; शिंदे सरकार स्वीकारणार पंचसूत्री कार्यक्रम-  महाराष्ट्र टाइम्स

5 Sept 2022, 10:41 am













मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशनने ‘पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम’ सरकारला सादर केला आहे.

यवतमाळ : विदर्भात अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वसंतराव नाईक शेती ‘स्वावलंबन मिशन’ने सरकारला ‘पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम’ सादर केला. ‘सर्वांत जास्त आत्महत्या होत असलेल्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम सरकारने लागू करावा,’ अशी मागणी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे.

असा आहे सूचना

- लागवडीचा खर्च, शेतीमालाचा भाव, जमीन व पाण्याचे पुनरुज्जीवन, उत्पादकता, बियांचे स्वातंत्र्य

- पीकपद्धती व अन्न, डाळी, तेलबिया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान

- सहज मुबलक पतपुरवठा धोरण

- नुकसानभरपाई, शेतकरी यांना वाचविणारी पीकविमा योजना

- प्रशासकीय, राजकीय, सामाजिक भ्रष्टाचाराचे ग्रामीण भागातून निर्मूलन

सात दिवसांत १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

२०२१च्या दुष्काळी वर्षात विदर्भात एक हजार १८० कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आला होत्या. २०२२मध्येही अतिवृष्टी आणि पुरामुळे आत्महत्यांचे सत्र वाढतच आहे. विदर्भात या वर्षी आठ महिन्यांत एक हजार ३२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, तर विदर्भात मागील सात दिवसांत १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशनने ‘पंचसूत्री एकात्मिक शेतकरी वाचवा कार्यक्रम’ सरकारला सादर केला आहे.

जोपर्यंत लागवडी खर्च कमी होत नाही, नवीन विकसित तंत्र, जमिनीचे आरोग्य, पाण्याचे नियोजन व त्याचे आरोग्य दुरुस्त होत नाही, तोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही. त्यावर सर्वांत पहिले काम करण्याचे ‘शेतकरी मिशन’ने सुचविले आहे. पीक पद्धती व अन्न, डाळी, तेलबिया या पिकांचे नगदी पिकांच्या ठिकाणी नियोजन व त्यासाठी अनुदान यावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी करून सहज मुबलक पंचवार्षिक पतपुरवठा देणारे धोरण; तसेच सततची नापिकी पुरबुडी, दुष्काळ यासाठी नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांच्या हिताची असणे गरजेचे झाले आहे. यावर सुधारणा करून शेतकऱ्यांचे प्राण वाचवणारी पीक विमा योजना तत्काळ लागू करण्याची सूचना ‘शेतकरी मिशन’ने केली आहे. सध्या सुरू असलेला अनियंत्रित प्रशासकीय, राजकीय, सामाजिक भ्रष्टाचारामुळे ग्रामीण विदर्भातील वातावरण बिघडले असून, गावापासून दिल्ली-मुंबईपर्यंत लोकप्रतिनिधी व सर्वच स्तराचे अधिकारी-कर्मचारी सरकारी पैशाची लूट करीत आहेत. त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक, आध्यत्मिक, सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment